मी वर्गीकृत लोकांत जन्मलो. त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे, याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे. या प्रतिज्ञेपासून पदच्युत करणारी अनेक आमिषे माझ्या आयुष्यात आली व गेली. फक्त स्वत:चेच चांगले करण्याचे मी लहानपणात ठरविले असते तर मला हव्या त्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग केला असता. परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतीप्रीत्यर्थ माझे सर्व आयुष्य वाहण्याचे ठरविले आहे आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्वाचा अवलंब करीत आलो आहे-ते तत्व हे की, जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो व ते कार्य पार पाडणे हेच ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे, त्याने ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचीत विचारसरणीचा व कृतीचा अवलंब केला तर ते श्लाघ्य होईल. वर्गीकृत लोकांच्या हिताहिताचा प्रश्न सरकारने फार दिवस त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत ठेवलेला आहे, हे पाहून माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची तुम्हाला (वरील हकिकतीवरून) कल्पना येईल.